दुष्टचक्रात ‘डॉक्टर-पेशंट’ नाते

दुष्टचक्रात ‘डॉक्टर-पेशंट’ नाते

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात झालेल्या प्रकारानंतर पुण्यात, तसेच समाजमाध्यमांवर प्रतिक्रियांचा खच पडला. त्यात उलट-सुलट चर्चा झाली. काहींनी अकारण नको त्या गोष्टीही याच्याशी जोडल्या. सध्या तर ‘ब्रेकिंग न्यूज’ आणि ‘मीडिया ट्रायल’च्या जमान्यात पुढची ब्रेकिंग न्यूज येईपर्यंत दोन-चार दिवस विषय तापवत ठेवला जातो. पुढे त्या गोष्टींमधील सत्य चौकशीअंती बाहेर आले की नाही, याची कोणीच दखल घेत नाही. याही प्रकरणात यथावकाश चौकशी समिती, ग्राहक मंच येथे साक्षी-पुरावे, कायदा यांना अनुसरून तथ्य पुढे येईलच. या प्रकरणात दोषींवर कायद्याप्रमाणे कडक कारवाई व्हायलाच पाहिजे. मात्र, या सर्व प्रकरणामुळे आपली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था किती सक्षम असणे गरजेचे आहे, हेही अधोरेखित झाले. आजही
आपल्याकडे सुमारे ३८ टक्के लोकांकडेच आरोग्यविम्याचे कवच आहे, असे आकडेवारी सांगते. परवडतील अशा दरात वैद्यकीय उपचार मिळणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे आणि यासाठी सरकारी रुग्णालये तेवढ्या तोडीची बनविण्याची
जबाबदारीही सरकारवर आहे. मात्र इतकी सक्षम सरकारी रुग्णालये नसल्याने लोकांना खासगी रुगणालयांकडे जाण्याशिवाय पर्याय नसतो.
या प्रकरणी ज्यांनी ज्यांनी खासगी रुग्णालयांबाबत आगपाखड केली, त्यातले किती जण वेळ आल्यावर सरकारी रुग्णालयांत जाऊन उपचार घेतील? गेल्या काही वर्षांपासून डॉक्टर-रुग्णालय आणि रुग्ण हे नाते दुष्टचक्रात अडकलेले दिसून येते. यातील वादाचे
प्रमुख कारण हे रुग्णालयातील बिल हे असते. तातडीचे वैद्यकीय उपचार है, ‘हे पोलिस प्रकरण आहे…. पैसे भरले नाहीत’ या कारणांस्तव थांबविता येणार नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निकाल आहेत, याची माहिती नागरिकांनी आणि
रुग्णालयांनी करून घ्यावी. खासगी रुग्णालयांत जे बिल होते त्यामध्ये डॉक्टरांचा हिस्सा तुलनेने कमी असतो. परंतु डॉक्टरच लुटतात, असा समज सर्वत्र पसरला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंचा वेध घेणे
आवश्यक ठरते.
इतर कुठल्याही व्यावसायिकाचा विचार करता, डॉक्टरांना देवाचे दुसरे रूप म्हणून ओळखले जाते, याबाबत दुमत नसावे. आणि इथे ‘भक्तां’ची गल्लत होते. डॉक्टर जर का देव असेल, तर त्याची विटंबना (हल्ला) करू नका, आणि डॉक्टर जर देव नसेल तर
त्याच्या मर्यादा ओळखा. सध्या परिस्थिती खरोखर इतकी गंभीर झाली आहे की ‘सेव्ह द सेव्हिअर’ असे म्हणायची वेळ आली आहे. कारण ताज्या प्रकरणात नामसाधर्म्यामुळे भलत्याच डॉक्टरच्या रुग्णालयाची
तोडफोड झाली आणि याचा त्रास तेथील अन्य रुग्णांनाही झाला. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीदेखील एका समारंभात याबद्दल चिंता व्यक्त केली होती. डॉक्टरांवरील हल्ले न थांबल्यास डॉक्टर औषधाला देखील मिळणार नाही, असे ते तेव्हा म्हणाले होते.

■ एक अपूर्ण शास्त्र वैद्यक शास्त्र हे एक ‘अपूर्ण शास्त्र’ म्हणून ओळखले जाते. अजब गुंतागुंतीचे यंत्र समजल्या जाणाऱ्या आपल्या शरीराची पूर्ण ओळख अजूनही झालेली नाही, हे अनेक डॉक्टरदेखील मान्य करतात. व्यक्ती तितक्या प्रकृती असल्याने प्रत्येकावरील उपचारांचा परिणामही वेगवेगळा ठरतो. एखाद्या आजारावर उपचार करण्याच्या वेगवेगळ्या; पण मान्यताप्राप्त व वर्षानुवर्षे वापरलेल्या पद्धती असतात.
प्रत्येक उपचार पद्धतीचे स्वतःचे फायदे-तोटे असतात. त्यामुळे संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांच्या ज्ञानाचा व कौशल्याचा पुरेपूर उपयोग करूनदेखील जर उपचारास यश आले नाही तर त्याचा दोष केवळ डॉक्टरांना देता येणार नाही, तसेच प्रत्येक वेळी
रुग्णाचा मृत्यू हा डॉक्टरांच्या हलगर्जीमुळेच झाला, असे गृहीत धरणे अत्यंत चुकीचे आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने तसेच राष्ट्रीय ग्राहक आयोगाने अनेक निकालांमध्ये स्पष्ट केले आहे. कोणत्याही डॉक्टरला आपल्या पेशंटचा मृत्यू व्हावा, असे वाटत नाही.
त्यामुळे या ‘अपूर्ण’तेची कल्पना आपल्या सगळ्यांना असणे आवश्यक आहे.

■ डॉक्टरांना कायद्याचा धाक वैद्यकीय निष्काळजीच्या खटल्यांत आत्तापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने संयत निर्णय दिलेले आहेत. योग्य तेथे कोट्यवधी रुपयांची नुकसानभरपाईही रुग्णाला देण्याचे आदेश दिलेले आहेत; डॉक्टरांचे परवाने रद्द केले आहेत. त्याचबरोबर फौजदारी कारवाईचे निकषदेखील घालून दिलेले आहेत.

उजव्या हाताऐवजी डाव्या हातावर शस्त्रक्रिया केली, एखाद्या शाखेचे ज्ञान नसतानादेखील त्या शाखेसंदर्भात उपचार केले, शस्त्रक्रियेनंतर पोटात कापसाचा गोळा विसरले अशा प्रकरणांत डॉक्टरांना न्यायालयाने जबर दंड अथवा शिक्षादेखील केलेल्या आहेत. या अशा निकालांमुळेच सध्या डॉक्टर कोणताही धोका पत्करत नाहीत आणि स्वतः निदान करणे शक्य असले तरी आधी बाहेर चाचणी करण्यास सांगतात. चाचणीचे अहवाल ‘नॉर्मल’ आले तर, उगाच चाचण्या करायला सांगितल्या, असेही म्हणणारे रुग्ण असतात.
दुसरीकडे, चाचणी करायला सांगितली नाही, तर डॉक्टर निष्काळजी होता, असेही म्हणतात. एकीकडे होणारे हल्ले आणि दुसरीकडे न्यायालयीन खटल्यांची भीती असे इतर कुठल्याही व्यवसायाबाबत आढळून येत नसेल. यामुळे आता रुग्णालयांत चक्क बाउन्सर्स
ठेवणे सुरू झाले आहे.

■ बेफिकीर आपण, दोष डॉक्टरांना ? वैद्यकीय निष्काळजीच्या प्रकरणांत बरेचदा ‘औषध न घे असोन वेथा, पथ्य न करी सर्वथा, न मिळे आलिया पदार्थ, तो येक मूर्ख’ असे रामदासस्वामींनी दासबोधात सांगून ठेवले आहे, ते दिसून येते. कायदा
असो वा वैद्यकीय उपचार, प्रत्येक प्रकरण हे वेगळे असते. त्यामुळे दुसऱ्याला लागू झालेला निकाल किंवा औषध हे आपल्याला चालेलच असे नसते. एकीकडे बेफामपणे गाडी चालवायची आणि अपघाताला निमंत्रण द्यायचे, किंवा डॉक्टरांनी, दारू पिऊ नका,
असे सांगितले तरी खूप प्यायची आणि मग किडन्या – लिव्हर निकामी झाले कि त्या परत उत्तम व्हाव्यात म्हणून डॉक्टरांकडे जायचे, किंवा चाचणी अहवालात शुगर कमी दिसावी म्हणून फक्त दोन दिवस अजिबातच गोड खायचे नाही आणि मग शुगर
कमी होत नाही म्हणून ओरडायचे, इंटरनेटवरून माहिती घेऊन स्वतःचे स्वतःच उपचार करायचे आणि या सर्व प्रकारात गुण आला नाही, आजार बरा झाला नाही म्हणून खापर डॉक्टरांवर फोडायचे आणि शेवटी डॉक्टरांनाच मारायचे आणि बिल कमी करून
घ्यायचे, असेही प्रकार घडत असल्याचे दिसते. आपल्या उपचारांचे पेपर्स, रिपोर्ट्स आदी मागण्याचा रुग्णालयाल हक्क असतोच. त्याचप्रमाणे एखाद्या रुग्णालयातील उपचार परवडत नसतील किंवा रुग्णालयावर विश्वास नसेल, तर डिस्चार्ज घेण्याचा
हक्क देखील रुग्णाला आहे. मात्र अशा वेळी पहिले रुग्णालय ‘वैद्यकीय सल्ल्याच्या विरुद्ध डिस्चार्ज घेतला’ असे लिहून घेते आणि पुढे काही गुंतागुंत झाल्यास त्याची जबाबदारी त्या रुग्णालयावर राहत नाही.
एकंदरीतच सध्या समाजामधील सहनशीलता संपत चालली आहे. सोशल मीडियावरती अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली ज्या काही प्रतिक्रिया लिहिल्या जातात त्याला तर काही धरबंधच नाही.

खचाखच गर्दीत गाडीचा थोडासा जरी धक्का लागला तरी लोक प्रचंड हमरीतुमरीवर आल्याचे दिसून येते. ‘कमीत कमी कायदे आणि कमीत कमी रुग्णालय’ ही आदर्श व्यवस्था अशक्य आहे, परंतु त्या दिशेने प्रयत्न व्हायला काय हरकत आहे?
(लेखक अभ्यासक आहेत.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *